पुणेरी टाइम्स टीम… दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाने येथील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. या कंपनीच्या प्रदूषणाने हवेत उडणाऱ्या सिमेंटच्या धुलीकनांमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झालेल्या असून पिकांवर या सिमेंटच्या धुलीकनाचा थर साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे या प्रदूषणाच्या बाबत लेखी तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. या प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांचे जीवनमान व आरोग्य धोक्यात आलेले असून त्यांना श्वसनाचे विकार व दम्याचे विकार होत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या चाऱ्यांवर सिमेंटच्या धुलीकनांचा थर साचल्याने जनावरे सदरचा चारा खात नाहीत. याबाबत प्रशासनाने तातडीने कंपनीवर कारवाई नाही केली तर शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे यांनी कंपनीच्या गेटवर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. शिवसंग्रामच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी कंपनी प्रशासन आणि शासकीय प्रशासन जबाबदार राहील असेही साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
