नाशिक 3 जून : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील काकडपाना या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खोलीत उतरून हे पाणी आणावं लागत होतं, या पाणी (Nashik Water crisis) प्रश्नाला News 18 Lokmat ने कालच (2 जून) वाचा फोडली होती. प्रशासनानं त्याची दखल घेत तातडीने गावात पाण्याचा टॅंक सुरू करण्याचे आदेश दिले आणि गावात पाण्याचा टॅंकर पोहोचला.
नाशिक शहरापासून अवघ्या ७५ ते ८० किलोमीटरवर आसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काकडपाना या भागात महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. हंडाभऱ पाण्यासाठी काकडपाना भागातील नागरिकांना संपूर्ण दिवस खर्च करावा लागत होता. गावापासून तब्बल ७ किलोमीटर अंतरावर एक प्रचंड खोल दरी आहे. या दरीत आपला जीव धोक्यात घालून पाणी भरण्यासाठी उतरावे लागत होते.
दरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या इतकी वाईट होती की, एका माणसालाही सहज चालता येत नाही. अशा या महिला डोक्यावर हंडा घेऊन वाट काढत चालत होत्या. यामध्ये एखाद्या महिलेचा पाय निसटला, तर महिलेच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. पण, असा जीव धोक्यात घालून रोज पाण्यासाठी महिलांना पायपीट करणं, हा त्यांचा दिनक्रमच झाला होता, पण News 18 Lokmat च्या बातमीमुळे आमच्या गावात पाण्याचा टॅंकर सुरू झाला, अशा भावना गावातील महिलांनी व्यक्त केल्या.
महिलांना सांगितली होती पाण्यासाठीची कसरत
पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला सांगतात की, “आमचं आयुष्य हे पाणी भरण्यातच चाललंय. इतक्या खोल दरीतून पाणी आणायचं म्हटल की, आम्हाला आमचा जीव नको नको वाटतो. पण काय करणार? आम्हाला कोण पाणी देणार? बरं इथं गेलं पाणी आणण्यासाठी गेलं की लगेच मिळतच असं नाही. दगडाच्या कपारीतून थेंब थेंब पाणी पडतं, ते पाणी जसं साचल तसं एकाने भरायचं.” हे पाणी आणण्यासाठी महिला रात्री-बेरात्री इथं नंबर लावून बसतात. काही नागरिक तर अस सांगतात की, “आम्ही इथं कित्येक वेळा झोपलो आहे. नाईलाज आहे. पाणी तर गरजेचं आहे ना?”, अशी परिस्थिती नागरिक व्यक्त करतात.
“दरवर्षी पुढारी मत मागायला येतात. तुम्हाला, लगेच पाईपलाईन घालून नळ कनेक्शन देतो, असं सांगतात. आमची मतं मिळवतात. निवडणुका (Election) होतात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. आमचा पाण्याचा प्रश्न तसाच पडून राहतो. कोणी आमच्याकडे बघत नाही. आमची ही वर्षानुर्षांपासून चाललेली परवड आहे. आमच्याकडे बघायला कोणी नाही.” ही परिस्थिती कथन करत असताना महिलांच्या डोळ्यांतून भावनिक होताना दिसत आहेत. हा पाण्याचा प्रश्न एका गावाचा नाही. तर पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मायबाप सरकार या आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांचा वापर फक्त निवडणुका पुरता करणार की त्यांना सुविधा देणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.