पुणेरी टाइम्स टीम…
अखेर दौंड शहरातील मुख्य ठिकाणांनी घेतला मोकळा श्वास घेतला, दौंड पोलिसांनी अतिक्रमणे हटवल्यानंतर नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे स्वागत…
गर्दीने गजबजलेल्या दौंड शहरातील रस्ते आणि चौकाचौकात कित्येक वर्षांपासून अस्ताव्यस्त केलेल्या अतिक्रमणावर अखेर दौंड पोलिसांनी हातोडा घातला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या या कारवाईने शहरातील मुख्य ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला असून दौंडकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
दौंड शहरातील संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्यालगत तसेच फुटपाथवर असणाऱ्या छोट-मोठ्या विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण करून शहराचा श्वास कोंडला होता. त्यामुळे वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होऊन याचा सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता.गेली अनेक वर्षांपासून बेशिस्त वाहतुक, अवैध प्रकारे करण्यात आलेली अतिक्रमणे यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण तर होतेच मात्र याचा फटका सर्वानाच बसतो. पोलीस निरीक्षक यादव यांनी हा उपक्रम हाती घेत स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमणांवर हातोडा घातला आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई!
‘शहरातील मुख्य ठिकाणांवर करण्यात आलेली अतिक्रमणे निघाल्याने वाहतुकीची कोंडी नियंत्रित होणार आहे. परंतु अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी पुन्हा जर जर कुणी अतिक्रमणे केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.याबाबत नागरिकांनी, व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
चंद्रशेखर यादव – पोलीस निरीक्षक दौंड
.